क्रिकेटच्या मैदानावर आज भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतासमोर आज न्यूझीलंडचे कठीण आव्हान असणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत खेळाडूंबाबत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो प्रत्येक कर्णधाराला सहज जमत नाही.
मुंबई : टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. फायनल म्हटलं की दबाव असणारच. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने संघातील खेळाडूंबद्दल महत्त्वाचे विचार मांडले.
तो म्हणाला की, “कर्णधार म्हणून फक्त वडिलांसारखी किंवा मोठ्या भावासारखी भूमिका घेऊन काही साध्य होत नाही. खेळाडूंना स्वातंत्र्य दिलं तर ते अधिक आत्मविश्वासाने आणि वेगळ्या पद्धतीने खेळू शकतात. मी बऱ्याच आधी समजून घेतलं आहे की प्रत्येकाला आदेश देऊन खेळवता येत नाही. खेळाडूंना मोकळेपण दिलं तर ते संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतात.”
याशिवाय तो पुढे म्हणाला, “माझ्यावरही दबाव असतो, पण जर मी तो मनावर घेतला नाही तर माझ्याकडून सर्वोत्तम खेळ होऊ शकतो. स्वतःच्या मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळण्याची संधी क्वचितच मिळते, त्यामुळे हा अनुभव खूप खास आहे.”

