रायगड जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या एप्रिलमध्ये संकलित चाचण्या; १००% शाळा भेट नियोजन अनिवार्य
वाकणनाका (सुनिल कोकळे) : रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्यात संकलित चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासोबतच शाळा भेट नियोजनाबाबतही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार, इयत्ता २ री ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दि.११, १५ व २२ एप्रिल) रोजी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत प्रथम भाषा, गणित तसेच तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची संकलित चाचणी क्रमांक २ घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही याच कालावधीत वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हास्तरावरून शाळा भेटीचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असून, नेमून दिलेल्या शाळांव्यतिरिक्त उर्वरित तालुक्यातील १०० टक्के शाळांच्या भेटीचे नियोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियोजन लवकर पूर्ण करून त्यावर गटशिक्षणाधिकारी व पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यासाठी स्वतंत्र गूगल फॉर्म लिंकही उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याद्वारे शाळा भेटीची माहिती सादर करावी लागणार आहे.
सदर आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


