“व्यायाम करा, आनंदी जीवन जगा” : वरिष्ठ पो.नि. राजेश शिरसाट यांचा मित्रांना आरोग्याचा कानमंत्र; १९९१ बी.ए. इंग्लिश बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात
जुन्या आठवणींना उजाळा, मैत्रीचा अनोखा संगम; दीर्घायु ॲग्रो रिसॉर्टमध्ये १७ मित्रांचा मनसोक्त जल्लोष
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
“रोज किमान ४५ मिनिटे चालणे, योगा करणे आणि संतुलित आहार घेणे हे निरोगी व आनंदी जीवनाचे रहस्य आहे,” असा आरोग्यदायी संदेश उल्हासनगर ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी आपल्या मित्रांना दिला.
अमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप कॉलेजच्या १९९१ च्या बी.ए. इंग्लिश बॅचचे स्नेहसंमेलन दि. ९ व १० मे २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथील दीर्घायु ॲग्रो रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडले. एकत्र आलेल्या सर्व मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा अनमोल ठेवा पुन्हा अनुभवला.
या स्नेहसंमेलनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट, पंचायत समिती धरणगावचे गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांच्यासह संजय शिनकर, राजेश शिरसाठ, यशवंत पाटील, हमीद पिंजारी, सोनु राजपूत, कमलाकर संदांशिव, सुनील चौक,शामकांत नेरपगार , दिलीप पाटील , जे. एस.पाटील, अनिल पाटील , मनोज शिंपी, किशोर अण्णा वानखेडे, सुनील आप्पा पाटील, संजय लोटन पाटील , कैलास बहारे, अनिल चौधरी आदी प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र सहभागी झाले होते. यावेळी राजेश शिरसाट यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव सांगतानाच व्यायाम, योगा व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत मित्र व त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निवृत्त तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्रांचा सत्कार करण्यात आला, तर नुकतीच पदोन्नती मिळालेल्या मित्रांचे अभिनंदन करण्यात आले.

दोन दिवसांच्या या स्नेहमेळाव्यात स्विमिंग, विविध कसरती, मनोरंजन, गप्पा-गोष्टी व संगीत मैफिलीने रंगत आणली. हार्मोनियमच्या सुरावटींवर कमलाकर संदांशिव यांनी सादर केलेल्या कविता व गीतांनी वातावरण भारावून गेले. विशेषतः “धन दौलत सब है जग में, दोस्ती जैसा धन नहीं…” या कमलाकर संदांशिव यांच्या स्वरचित गीताने मित्रपरिवार भावूक झाला.
“खरी मैत्री ही राग, लोभ, मत्सर आणि अहंकारापासून दूर असते,” याचा प्रत्यय प्रत्येकाला या स्नेहसंमेलनातून आला. निरपेक्ष मैत्री, जुन्या आठवणी आणि आनंदी क्षणांनी भरलेल्या या मेळाव्याचा शेवट पुढील स्नेहसंमेलनात पुन्हा भेटण्याच्या वचनांसह साश्रूनयनांनी झाला.

